monsoon news india : दरवर्षी 1 जून रोजी केरळमार्गे मुख्य भूमीत दाखल होणारा नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) यंदा चार ते सात दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) केरळमध्ये 4 जूनला पाऊस पडेल आणि स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने 7 जूनला पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भाग जूनच्या मध्यापर्यंत उष्मा कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरवर्षी नैऋत्य मोसमी पाऊस 1 जून रोजी केरळ किनारपट्टीवरून भारतात प्रवेश करतो. यानंतर त्यांचा भारतीय उपखंडात प्रवास सुरू होतो. मान्सूनची सुरुवात आणि कालावधी हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. IMD च्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील पावसाच्या ताज्या अंदाजानुसार, मान्सूनचे आगमन उशिरा होईल. यावर्षी, आयएमडीने मे महिन्याच्या सुरुवातीला सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सूनचे उशिरा आगमन हा चिंतेचा विषय ठरू शकतो.
पावसाचा अंदाज वर्तवताना गेल्या 50 वर्षांतील झालेल्या पावसाचा अभ्यास केला जातो. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत 106 टक्के पाऊस झाला होता. विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनच्या पावसाची शक्यता सुमारे 35 टक्के, सरासरीपेक्षा सुमारे 29 टक्के कमी सरासरीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता केवळ 11 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
उशीर का?
‘एल निनो’ची (El Nino) स्थिती, हिंदू महासागरातील (Indian Ocean) द्विध्रुव परिस्थिती आणि उत्तर गोलार्धात (Northern Hemisphere) बर्फाचे आच्छादन (Snow cover) कमी होण्याची शक्यता यांसारख्या कारणांमुळे यंदाच्या र्नैऋत्य मोसमी पावसावर (Southwest monsoon) परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र ‘एल निनो’ नेहमीच र्नैऋत्य मोसमी पावसाला मारक ठरतो, असे नसल्याचे हवामानतज्ज्ञ (Meteorologist) सांगत आहेत. हवामान विभागानेही यंदा पाऊस सरासरीइतकाच राहील, असा अंदाज यापूर्वी वर्तविला आहे.
अन्न, पाणी आणि वीज..
कृषीप्रधान देशांचे अर्थचक्रही मान्सूनच्या आगमनावर अवलंबून असते. भारतातील 52 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. यासोबतच देशभरातील धरणांमध्ये पुढील वर्षासाठी लागणारा पाणीसाठाही या चार महिन्यांत केला जातो. जलविद्युत प्रकल्पांतून होणारे विजेचे उत्पादनही धरणांच्या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे अन्न, पाणी आणि वीज या तीन गरजा मान्सूनच्या पावसानेच भागवल्या जातात.
पावसाच्या आगमनाची तारीख आणि पावसाचे प्रमाण यांचा काही संबंध नाही. तसेच केरळमध्ये लवकर किंवा उशिरा येणारा पाऊस त्याच प्रमाणात देशाच्या इतर भागात पसरेल असे नाही. मोसमी पावसावर परिणाम करणारे अनेक जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक घटक असतात. – एम. मोहपात्रा, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग.
वाचा : सोयाबीन, खरीप बियाण्यांवर या वर्षी मिळणार अनुदान! जाणून घ्या दर